नागपूर/मुंबई- राज्यातील शेतकरी कर्जमाफीची रक्कम लाभार्थींच्या खात्यात जमा होत आहे. परंतु अर्ज न भरताही शिवसेनेचे आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाल्याची धक्कादायक माहिती उघड झाली आहे.
आमदार आबिटकर यांनी सांगितले की, अर्ज न भरता माझ्या खात्यात कर्जमाफीची रक्कम जमा झाली असेल तर राज्यातील कर्जमाफीमध्ये घोटाळा झाल्याच्या शक्यता नाकारता येत नाही. सरकारने ही चूक दुरुस्त करुन गरजू लाभार्थींना ही मदत देण्यात यावी, अशी मागणीही केली आहे.
कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार प्रकाश आबिटकर यांच्या खात्यात कर्जमाफीचे 25 हजार रुपये जमा झाले आहेत. महत्त्वाचे म्हणजे आबिटकर यांनी ही माहिती विधानसभेत दिली आहे. कर्जमाफीसाठी त्यांनी कोणताही अर्ज भरला नव्हता. तरीदेखील पैसे जमा झाल्याने आश्चर्य व्यक्त केले आहे.
शिवाजी महाराज जयंतीवरून गदारोळ
दरम्यान, छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती 8 एप्रिलला एकाच दिवशी साजरी करण्याच्या भाजप सदस्य सुरेश हाळवणकर यांच्या मागणीवर मागणीवरून विधानसभेत गदारोळ झाला. मागणीचा उल्लेख कामकाजातून काढून टाकण्याची विरोधकांनी मागणी केली. त्यास सभापती हरिभाऊ बागडे यांनी स्पष्ट नकार दिला. त्यावरून सत्तारूढ आणि विरोधकांत जोरदार बाचाबाची झाली. विरोधकांनी सभागृहात सरकार विरोधात घोषणाबाजी केली.

No comments:
Post a Comment