अकलूज-शेती क्षेत्र दुर्लक्षित ठेवल्याने यंदा देशाचा विकासदर घसरला आहे. केंद्र सरकारने राष्ट्रीयीकृत बँकांचा तोटा भरून काढण्यासाठी १५ दिवसांत तिजोरीतून ८० हजार कोटी दिले आहेत. येथे पैसा आहे आणि इकडे सरसकट कर्जमाफीसंदर्भात हात वर केले जातात. सरकारचे हे दुटप्पी धोरण असल्याची टीका माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांनी केली. या सरकारला खाली खेचण्यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी मतभेद बाजूला सारून एकत्र येण्याच्या हालचाली सुरू असल्याचेही ते म्हणाले.
सहकारमहर्षी शंकरराव मोहिते-पाटील यांच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून अकलूजमध्ये शिक्षण प्रसारक मंडळाने बांधलेल्या रत्नाई महिला वसतिगृहाचे उद््घाटन शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी पवार बोलत होते. ते पुढे म्हणाले, सध्याच्या सरकारला पिकवणाऱ्यांपेक्षा खाणाऱ्यांची जास्त चिंता आहे. परंतु खाणारे कायम बघायचे असतील तर पिकवणारा जगला पाहिजे हे यांना कोणी समजावायचे? केंद्राच्या सांख्यिकी खात्याचा अहवाल नुकताच प्राप्त झाला आहे. यात देशाचा विकासदर घटल्याचे नमूद आहे. शेती क्षेत्राकडे दुर्लक्ष केल्यानेच हा विकासदर घटला आहे. कोणत्याही क्षेत्रावर संकट आले तर त्यास मदत करण्याची भूमिका राज्यकर्त्यांची असते याचे भान या सरकारला नाही, अशी टीकाही त्यांनी या वेळी केली. आता दोन्ही काँग्रेसने मिळून काम करण्याची गरज आहे. देशात व राज्यात परिवर्तन आणायचे असेल तर दोन्ही काँग्रेसने मतभेद बाजूला ठेवून काम केले पाहिजे. यासाठी सोलापूर जिल्ह्याची महत्त्वाची भूमिका ठरेल, असे ते सुशीलकुमार शिंदेंना उद्देशून म्हणाले. काँग्रेस-राष्ट्रवादी एकत्रित येण्याच्या दृष्टीने वाटचाल सुरू झाली असल्याचेही पवारांनी सांगितले.
डाेळा मारु नका
माढ्याचे आजी-माजी खासदार येथे उपस्थित आहेत. या लोकसभा जागेवर बऱ्याच जणांचा डोळा होता. त्यांना आमच्या बरोबरच्यांनी डोळा मारू नये म्हणजे बरं....
- रामराजे नाईक-निंबाळकर
शरद पवारांनी आजवर मला मोठ्या भावाची साक्ष देऊन सहकार्य केले आहे. हा ऋणानुबंध यापुढेही कायम राहील. जिल्हा त्यांच्या पाठीशी राहील.
- खासदार विजयसिंह मोहिते

No comments:
Post a Comment