मुंबई- धुळ्यातील एका 80 वर्षीय शेतक-याने मंत्रालयात जाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. सरकारने औष्णिक वीज प्रकल्पासाठी पाच एकर जमिन संपादित केल्यानंतरही त्याचा मोबादला मिळत नसल्याने सरकार दरबारी व मंत्रालयात खेटे मारूनही कोणीही दाद देत नसल्याने व्यथित होऊन शेतक-याने हे पाऊल उचलले आहे. धर्मा पाटील असे शेतक-यांचे नाव असून, त्यांची प्रकृती गंभीर आहे. त्यांच्यावर मुंबईतील सेंट जॉर्ज रूग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
धुळे जिल्ह्यात औष्णिक वीज प्रकल्पासाठी धर्मा पाटील यांची पाच एकर जमिन संपादित केली आहे. पाच एकर जमिनीसाठी सरकारने केवळ त्यांना 4 लाख रूपयेच मदत हातात टेकवली आहे. इतर शेतक-यांच्या तुलनेत कमी भरपाई मिळाल्याचे या शेतक-याचे म्हणणे आहे. त्यामुळे मागील तीन महिन्यापासून सरकारी दरबारी ते खेटे मारत आहेत. मात्र, जिल्हाधिकारी कार्यालयापासून ते मंत्रालयापर्यंत त्यांची कोणीही दखल घेतली नाही.
आपल्याला साधी योग्य माहिती व उत्तर दिली जात नाहीत, त्यामुळे व्यथित होऊन या शेतक-याने रविवारी मंत्रालयातच विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्यांना मुंबईतील सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. यानंतर त्यांची भेट धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी घेतली. मात्र, मदतीबाबत कोणतेही ठोस कार्यवाही झालेली नाही.
धर्मा पाटील यांच्या शेतजमिनीत आंब्याची 600 झाडे होती. जमिनीवर विहीर, वीज, ठिबक सिंचन आदी सुविधा असून, ही बागायती शेती आहे. तरीही केवळ चार लाख रूपये मोबादला कसा दिला गेला याचे उत्तर कोणीही देत नाही. याऊलट त्यांच्या आसपासच्या शेतक-यांना योग्य मोबदला दिला गेला आहे त्यामुळे प्रशासन व सरकारी यंत्रणांना वैतागून धर्मा पाटील विष प्राशन करून जीवन संपविण्याचा प्रयत्न केला. तरीही अजून सरकारला जाग आलेली दिसत नाही

No comments:
Post a Comment