तीव्रता कमी मात्र सावधानतेचा इशारा; केरळमध्ये मृतांची संख्या १९ वर
ओखी वादळाची तीव्रता कमी होत असली तरीही ४ डिसेंबरच्या रात्रीपासून पुढील ४८ तासांत महाराष्ट्र आणि दक्षिण गुजरातच्या किनारपट्टीवर वादळाचा धोका असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे. तसेच समुद्र खवळण्याची शक्यता असल्याने मच्छीमारांना सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे.
दरम्यान, संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन रविवारी कन्याकुमारी येथे पोहोचल्या असून त्यांनी तामिळनाडूचे उपमुख्यमंत्री ओ. पनीरसेल्वम यांची तसेच अन्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन मदतकार्याचा आढावा घेतला. त्या सोमवारी केरळ आणि तामिळनाडूच्या पूरग्रस्त भागांना भेट देणार आहेत. चक्रीवादळाने केरळच्या खवळलेल्या सागरात अडकून पडलेल्या १७ मच्छीमारांची पाच दिवसांनंतर सुटका करण्यात यश आले आहे. नौदलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयएनएस काल्पेनी या नौकेने १३ मच्छीमारांना वाचवून त्यांना कोल्लम येथील अधिकाऱ्यांच्या हवाली केले. हवाई दलाच्या हेलिकॉप्टरने कायामकुलमपासून पश्चिमेला ३० मल अंतरावर चार मच्छीमारांची सुटका करून त्यांना वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात दाखल केले. हवाई दलाची नऊ, नौदलाची तीन विमाने तसेच नौदलाची १० जहाजे मदतकार्यात सहभागी होती.
वादळामुळे केरळजवळील समुद्रामध्ये अडकलेल्या ६०० हून अधिक मच्छीमारांची सुटका करण्यात यश आले असले तरी राज्यातील मृतांचा आकडा रविवारी १९ वर पोहोचला आहे. रविवारी सहा नवे मृतदेह सापडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शनिवारीदेखील सहा मृतदेह सापडले होते. त्यानंतर मृतांची संख्या सातवरून १३ वर गेली होती

No comments:
Post a Comment