नांदेड शहराजवळ असलेल्या नांदूसा येथे आज पाण्याच्या टँकरमध्ये मोठ्या प्रमाणात अळ्या, किडे आणि शेवाळ आल्याने नागरिक संतप्त झाले. नांदेडच्या जलशुध्दीकरण केंद्रातून हे पाणी नांदूसा येथे रोज टँकरने येते.
नांदेड तालुक्यातील नांदूसा येथे आज टँकर आला असताना गावकऱ्यांनी पाणी भरण्यासाठी एकच गर्दी केली. मात्र या टँकरच्या पाण्यातून अळ्या, किडे आणि शेवाळ मोठ्या प्रमाणात आल्याने नागरिक चांगलेच संतप्त झाले. जलशुध्दीकरण केंद्रातून शुध्द पाणी मिळेल ही अपेक्षा नांदूसेकरांची होती, मात्र यात मोठ्या प्रमाणात अशुध्द पाणी व ज्यात किडे वळवळतांना आणि अळ्यांचा मुक्त संचार या पाण्यामध्ये दिसून येत होता. या घटनेचे वृत्त काही गावकऱ्यांनी शिवसेना आमदार हेमंत पाटील यांना कळविल्यानंतर त्यांनी प्रशासनाला याबाबतची माहिती दिली. हा प्रकार गंभीर असल्याचे आणि तातडीने याकडे लक्ष घालण्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. त्यानुसार गटविकास अधिकारी, तलाठी व ग्रामसेवक घटनास्थळी पोहंचले. नागरिकांचा प्रचंड रोष यावेळी दिसून आला. एकीकडे पाण्याची टंचाई त्यामुळे या भागात पिण्याचे पाण्याचे मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष्य आहे. असे असताना जलशुध्दीकरणातून थेट येणारे पाणी एवढे घाणेरडे कसे, असा प्रश्न गावकऱ्यांनी विचारला. मात्र तेथे असलेल्या गटविकास अधिकाऱ्यांनी तुमचे गावचे टँकरच बंद करतो, अशी धमकी दिली. त्यामुळे गावकरी आणखीच संतप्त झाले. काहींनी जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. या घाणेरड्या पाण्यामुळे अगोदरच रोगराईने त्रस्त झालेल्या नागरिकांना आणखीनच त्रास होणार असल्याने तातडीने या प्रकाराकडे लक्ष घालावे, अशी मागणी नांदूसावासियांनी केली आहे. टँकरमध्ये पाणी भरताना संबंधितांचे लक्ष कसे गेले नाही, अळ्या आणि किड्यांचा मुक्तसंचार या पाण्यामध्ये दिसून येत होता. संबंधित प्रकार अत्यंग गंभीर असून याकडे तातडीने लक्ष द्यावे, अशी मागणी ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आली आहे.

No comments:
Post a Comment