2 मार्च : विविध मागण्यांसाठी बळीराजा देशाच्या आर्थिक राजधानी मुंबापुरीत दाखल झालाय. मुंबईमध्ये पोहचलेल्या मोर्चाला समाजाच्या सर्वच स्तरातून मदत केली जात आहे.
आझाद मैदानाच्या परिसरात जात-धर्म न बघता जमियत उलेमा ए महाराष्ट्र या संघटनेकडून पाणी, फळं आणि बिस्कीटांचं वाटप केलं जात आहे. जोपर्यंत हा मोर्चा मुंबईत असेल तोपर्यंत शक्य तितकी मदत आम्ही करु असं या संघटनेकडून सांगण्यात आलंय.
तर आझाद मैदानात पोहचलेल्या शेतकर्यांना विविध संघटना आणि शिवसेनेकडून प्रथमोपचार केंद्र, सकाळी चहा नाश्ता आणि पाण्याची व्यवस्था करण्यात आलीय.
दरम्यान, शेतकऱ्यांचा मोर्चा आज आझाद मैदान इथे मुक्कामी आहे, रात्री मोर्चा आझाद मैदान इथं पोहोचल्यानं मुंबईने सुटकेचा निश्वास टाकला. मोर्चामुळे शहरात आता कुठेही वाहतून कोंडी नाही की वाहतूक वळवण्यात आलेली नाही, आझाद मैदान इथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
जवळपास अडीच हजार पोलीस तसेच राखीव दलाच्या दोन तुकड्या सुरक्षा तसंच व्यवस्था तैनात करण्यात आलीये.
3 अँब्युलन्स आझाद मैदान इथे सज्ज ठेवण्यात आल्या आहेत- काल दिवसभर 30 किलोमीटरचा प्रवास आणि रात्रभर सायन ते आझाद मैदानापर्यंत पायी प्रवास झाल्याने अनेक शेतकऱ्यांना रक्तदाब तसंच डायरियाचा किरकोळ त्रास होतोय. यासाठी 12 वैद्यकीय पथकं तिथेच विविध ठिकाणी आवश्यक तपासणी करत आहेत.

No comments:
Post a Comment