गोवा : जीवाचा गोवा करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांना यापुढे खबरदार रहावे लागणार आहे. बीच किंवा कोणत्याही सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करताना कोणी आढळला तर तो दंडनीय अपराध ठरणार आहे.
सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करून रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून देण्याच्या प्रकारामुळे कचऱ्याची समस्या गंभीर बनत चालली असून, सरकारने त्याची दखल घेत कडक पावले उचलण्याचे ठरवले आहे.
पणजी येथील कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या उद्धाटनानंतर बोलताना मुख्यमंत्री पर्रिकर यांनी ही माहिती दिली. येत्या 15 दिवसात कायद्यात तरतूद करून त्याची पुढच्या महिन्यापासून कडक अंमलबजावणी केली जाणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.
नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी आलेले पर्यटक दारुच्या दुकानांसमोर आणि बीचवर दारु पिऊन बाटल्या तिकडचे टाकून जात असल्याचे आढळून आले होते. कळंगुट किनाऱ्यावर बियरच्या बाटल्या हातात घेऊन बीचवर जाणाऱ्या पर्यटकांना पोलिस रोखत असल्याचे चित्र पहायला मिळत होते.
स्थानिक लोक देखील पुलांवर किंवा सार्वजनिक ठिकाणी मद्यपान करुन रिकाम्या बाटल्या तेथेच टाकून कचरा करत असल्याने कचरा उचलून साफ सफाई करण्याचे सरकारी यंत्रणेचे काम वाढले आहे. या पार्श्वभूमीवर सरकारचा हा निर्णय महत्वाचा ठरणार आहे.
No comments:
Post a Comment